Thursday, March 30, 2017

फेसबुकवरील फ्रेंडलिस्ट १०० च ठेवायची असा आलो तेव्हा विचार होता  पण ते शक्य झाले नाही पण आता फक्त ५०० च ठेवायचे आणि बाकी सगळे गाळायचे असे ठरवले त्यामुळे अनेक महत्वाचे लोकही गाळावे लागले त्याबद्दल क्षमा मागतो आणखी काही गाळावे लागतील त्यांची आगामीच माफी मागतो माझी इतरांच्या पोस्ट्स वाचण्याची क्षमता मर्यादित आहे त्यामुळे हे करावे लागले सॉरी आणि इतका काळ साथ दिल्याबद्दल धन्यवाद
श्रीधर तिळवे नाईक 
आऊटडेटेड झालेले पुरोगामी आणि इनडेटेड झालेले परंपरावादी ह्यांच्यातला हा संघर्ष आणि तो कमालीचा हास्यास्पद कमालीचा पोस्टमॉडर्न आहे अतिशय शांत डोकं ठेवूनच त्याला सोडवावं लागेल 
कृपया फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका जी यादी आहे तीच अनेक मातब्बरांना कट करत ८३६ वर आणलीये आणि ती ५०० वर आणतांना कुणाला कट करायचं कुणाला वगळायचं हे आता अवघड बनत चाललंय त्यात नवीन लोकांना कुठून जागा देणार ?हे अकाउंट फिल्मी लोकांसाठी बिलकुल नाहीये हे तर पुन्हा पुन्हा सांगितले आहेच त्यामुळे बॉलीवूडवाले असाल तर ह्या अकाउंटकडे बघूही नका  हे फक्त साहित्यिक ऍक्टिव्हिटीसाठी सुरु केलेले प्रामुख्याने मराठी अकाउंट आहे इथल्या यादीत असलेल्या अपवादात्मक फिल्मी व्यक्ती ह्या मुळात प्रथम माझ्या मित्र आहेत काहींच्या आईबापांबद्दल आदर आहे म्हणून त्या आहेत   काही अपवाद वगळता माझे ९९ % वैयक्तिक मित्रही आणि नातेवाईकही ह्या इथे नाहीत ज्यांच्याशी रोज फोनवर बोलता येते त्यांना फेसबुकवर भेटणे हा मला मूर्खपणा वाटतो पी आर ओ शीप आजच्या जगात महत्वाची गोष्ट आहे ह्याची मला कल्पना आहे आणि फेसबुक त्यासाठी उत्तम माध्यम आहे ह्याची मला कल्पना आहे पण संन्याश्यांनी ह्या भानगडीत पडू नये असे मला वाटते . साधनेला फेसबुकचा काडीचाही फायदा नाही त्यामुळे तुमच्यापैकी जे अध्यात्मिक आहेत त्यांनी थेट भेटावे किंवा ई-मेल करावा थिएटर अकादमीतल्या विद्यार्थ्यांनो तुम्हाला पेंडिंग ठेवलंय म्हणून माफी मागतो लवकरच निर्णय घेईन . काहींनी खांदे द्यायला कोण येणार असं विचारलंय मित्रांनो माझ्या मृत्यूनंतर देहदान करा हे मी सांगितलेले आहेच आणि जे उरेल ते विद्युतदाहिनीत जाळा हेही ! त्यामुळे खांदेकऱ्यांची गरज नाही . मी संन्यासी आहे धार्मिक नाही .  मी आयुष्यात मिञफुगवटा कायमच टाळलाय इथेही तोच प्रयत्न आहे पुन्हा एकदा क्षमाप्रार्थी आहे
श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, March 21, 2017

गोविंद तळवलकर :अखेरचा रॉयिस्ट चेहरा श्रीधर तिळवे नाईक

भारतातील सर्वात उपेक्षित विचारप्रणालीकार कोणता असा प्रश्न मला कुणी विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर मी मानवेंद्रनाथ रॉय असे देईन जो न्याय बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर  . न्यायमूर्ती रानडे  बॅरिस्टर गोखले ह्यांना मिळाला तो रॉय ह्यांना मिळाला नाही कारण ते लोकायती होते . भारतातील लोकायत दर्शनाची एक प्रदीर्घ परंपरा आहे तिला उजाळा दिला डाव्या लोकांनी! ह्या डाव्या लोकांच्यात स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीने  स्वतःची विचारप्रणाली निर्माण करणारा भारतातील एकमेव डावा विचारवंत म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय ! त्यांना फादर ऑफ इंडियन कम्युनिझम म्हणून ओळखले जाते पण ते मार्क्समध्ये थांबले नाहीत त्यांनी मार्क्सला अधिक काळानुरूप केले आणि स्वतःचा स्वतंत्र रॅडिकल ह्युमॅनिझम जन्माला घातला

ह्या मानवेंद्रनाथांच्या विचारसरणीने मराठीत सहा   रॉयिस्ट चेहरे जन्माला घातले १ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी २ प्रभाकर पाध्ये ३ यशवंतराव चव्हाण ४ द्वा भ कर्णिक ५ व्ही एम तारकुंडे आणि ६ वे  गोविंद तळवलकर तळवलकरांच्या निधनाने रॉयिस्ट विचारप्रणालीतील शेवटचा मराठी चेहरा निखळून पडला आहे  खुद्द रॉय हे स्वामी विवेकानंद आणि बिपीनचंद्र पॉल ह्या कोलकत्ती परंपरेत वाढले होते पण ते तिथे न थांबता जगभर विस्तारत गेले स्टालिनची काळी करणी कळलेले ते पहिले मार्क्सवादी होते आणि नेहरूंना आंधळे मार्क्सवादी होण्यापासून त्यांनी वाचवले होते त्यामुळे साहजिकच नेहरूवादाचा एक पाय गांधीवादी तर दुसरा पाय रॉयवादी होता साहजिकच शेवटी शेवटी तळवलकर नेहरूंच्या विषयी ऑब्सेशन म्हणावे इतके वेडे झाले होते

प्रखर पण सौम्य चेहऱ्याचा बुद्धिवाद हा  रॉयिस्ट चेहऱ्याचा आणि त्यामुळे साहजिकच तळवलकरांचाही विशेष होता मार्क्सवादी हिंसा व एकाधिकारशाही त्यांना अमान्य होती पण युरोपियन प्रबोधन आणि रशियन साहित्य ह्या दोन्ही गोष्टीविषयी त्यांना विलक्षण जिव्हाळा होता प्रखर बौद्धिक विश्लेषण ही त्यांच्या अग्रलेखांची खासियत  होती १९८१ ते १९८५ ह्या दरम्यान रशियात होत असलेल्या कम्म्युनिझमच्या पडझडीविषयी नेमकी खबर असलेले ते एकमेव संपादक होते त्यांच्या काळात म.  टा हा बुद्धिवादाचा मित्र होता आणि अत्यंत सौम्य भाषेत राजकारण्यांची खरडपट्टी काढण्यात प्रवीण होता . राजकारण्यांचे बौद्धिक दिवाळे निघालेले न्हवते त्यामुळे गोविद तळवलकर महाराष्ट्र टाइम्स आपल्याविषयी काय म्हणतात  ह्याची राजकारण्यांनाही फिकीर होती १९६८ ते १९९६ असा प्रदीर्घ काळ ते संपादक होते आणि ह्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा धाक होता . टोलेजन्ग विद्ववता आणि साधी भाषा ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ त्यांच्या लेखात होता . वाचता वाचता हे त्यांचे आमच्या तारुण्यातले एक आवडते सदर होते त्या काळात त्यांना अग्रलेखाचा बादशहा मानले जाई आणि ते त्याला पात्र होते
मानवेंद्रनाथ रॉय ह्यांनी युरोपियन प्रबोधनाचा जसा इतिहास खोलला तसा गोविंद तळवलकरांनी आपल्या अनेक पुस्तकातून नौरजी ते नेहरू असा इतिहास खोलून दाखवला मला स्वतःला त्यांची सत्तांतर आणि सोविएत साम्राज्याचा उदय आणि अस्त हे दोन बहुभागी ग्रंथ अतिशय आवडतात .

ह्याचा अर्थ त्यांना मर्यादा न्हवती काय ? तर होती त्यांची पिढी भारतीय आणि युरोपियन प्रबोधनात इतकी अडकून गेली कि त्यांना स्वतःच्या आसपास घडणारे प्रतिसृष्टीय बदल सूक्ष्मपणे कळलेच नाहीत त्यामुळे मनमोहनसिंगांनी पुढे जे बदल आणले त्याची तयारी करून घेणे ही जी त्यांच्यावर जबाबदारी होती ती त्यांनी पुरेश्या प्रभावीपणे पार पाडली नाही एकप्रकारे साठोत्तरी मध्यमवर्गीय नोकरदारांची पत्रकारिता हे त्यांचे स्वरूप राहिले मात्र ह्या मर्यादेतही त्यांनी ज्या आंतरिक तळमळीने काम केले तिला तोड नाही . त्यांनी आमच्या पिढीला प्रबोधनाची योग्य अशी पार्श्वभूमी पुरवली आणि मार्क्सच्या अतिरेकी प्रभाव पडण्याच्या शक्यतेपासून कायमचे वाचवले . लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी चौथ्या स्तंभाने काय केले पाहिजे ते त्यांनी त्यांच्या जीवनातून शिकवले . त्यांचा अस्त हा मराठीतील सहाव्या रॉयिस्ट चेहऱ्याचा अस्त आहे त्यांना माझी बुध्दिपूर्ण श्रद्धांजली !

श्रीधर तिळवे नाईक

माझ्या मर्यादित माहितीनुसार ओशोंशी ज्यांचा संबंध आला ते त्यांचे भाऊ गोपीनाथ तळवलकर होते .

शरद पवार हे रॉयिस्ट यशवंतरावांचे शिष्य त्यामुळे ते रॉयिस्ट आणि नेहरूवादी अजेंडाच राबवणार अश्या अटकळीने गोविंदरावांनी शरद पवारांना कायम पाठिंबा दिला पवार सत्ताहीन झाले तर काँग्रेसचे काय हा प्रॅक्टिकल प्रश्न त्यांच्यापुढेही होता आणि नंतरच्या काँग्रेस पुढाऱ्यांनी कणाहीन आणि दिशाहीन राजकारण करून हा प्रश्न अधिकच जटिल बनवला .

शरद जोशींच्या बाबत तळवलकर साफ चुकले किंबहूना त्यांना पर्सनल खुन्नस होती कि काय असे वाटण्यापर्यंत गडबड होती मी माझ्या लेखात म्हंटल्याप्रमाणे मध्यमवर्गीय नोकरदाराची पत्रकारिता असेच त्यांच्या पत्रकारितेचे स्वरूप होते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना कळत होते असे वाटत नाही . नेमाडे न कळण्याचे कारणही हेच होते नेमाडेंनी आयुष्यभर त्यामुळेच मटा ची टर उडवली ते एका अर्थाने पूर्ण मार्गी होते देशीवाद त्यांना कळलाच नाही

तळवलकरांनी टीका प्रधान बनवली वगैरे चूक आहे आचार्य अत्रेंनी घणाघाती व अर्वाच्य टीकेचे जे स्कूल चालू केले त्याला उलट प्रभाकर पाध्ये व तळवलकरांनी पायबंद घातला
श्रीधर तिळवे नाईक







SHRIDHAR TILVE WITH IBN LOKMAT बेधडक ( 20 मार्च)- योगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिं...

Sunday, March 19, 2017

सतीश तांबे ह्यांनी श्रीकांत सराफ ह्यांच्या टॅग केलेल्या पोस्टला मी दिलेली कॉमेंट

भूतान आणि भारत भारताचे भूतानिकारण व क्युबीकरण अशक्य का आहे ? श्रीधर तिळवे नाईक

भूतानमध्ये शांती आणि सलोखा आहे त्याचे मुख्य कारण तिथे बौद्ध ७५% आणि हिंदू २४ . ५% आहेत उरलेले धड अर्धा टक्केही नाहीत त्यामुळे ९९% जर शांतताप्रिय धर्मात  असतील  तर अशांतता येणार कुठून ?क्युबा नेमका उलटा तिथे ९९% नास्तिक वा धर्म घरात ठेवणारे ह्यांच्या उदाहरणांनी आपले प्रश्न सुटणार नाहीत आपल्याकडे धर्मांतराचा प्रचंड मोठा इतिहास आहे सुरवातीला
 १००% शैव
मग ९७% शैव ३% वैदिक
मग अशोकाच्या काळात ५०% बौद ४०% शैव १०% वैष्णव वैदिक ब्रह्मन्
मग शंकराचार्यांच्यानंतर ६०% शैव ३० % हिंदू शैव वैष्णव ५ % बौद्ध ५% ब्राह्मण वैदिक
मग रामानुजाचार्यांच्यानंतर ६०% हिंदू शैव  वैष्णव ३४% शैव ५ % ब्राह्मण वैदिक १% इतर
मग मुस्लिम राजवटीनंतर फाळणीपूर्व भारतात  ४३ % मुस्लिम ४० %हिंदू शैव वैष्णव १२ % शैव २ % वैदिक ब्राह्मण आणि ३% इतर !

एवढ्या मोठ्या प्रमाणावरची धर्मांतरे इतर कुठल्याही देशात झालेली नाहीत भारताची धर्माच्या आधारेच फाळणी झाली होती हे विसरता येत नाही हिंदू शैव वैष्णव ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिदेवतांची पूजा करत असल्याने त्यांना शैव समजण्याची चूक अनेकजण करतात पण प्रत्यक्षात हे शैव न्हवेत शैव जातिवर्णव्यवस्था मानत नाहीत आणि स्वतःचे आगम धर्मग्रंथ सर्वांनाच खुले करतात ज्यादिवशी हिंदू शैव वैष्णव जातिवर्णव्यवस्थेचा  त्याग करतील आणि  वेद आगम  म्हणजे सर्वांसाठी खुले करतील त्यादिवशी ते शैव होतील आणि त्यांनी वेद खुले करावेत  आणि  जातिवर्णव्यवस्थेचा अस्पृश्यतेचा  त्याग करावा हा माझा आग्रह आहे
भूतानमध्ये मुस्लिम फक्त ७००० आहेत आणि ते तिथे कायमच तडजोडीच्या मूडमध्ये असतात भारतात ही स्थिती नाहीये त्यामुळे उद्या जर मुस्लिम किंवा वैदिक कट्टर झाले तर प्रचंड अशांतता अटळ आहे त्यामुळे आपल्या समस्या हाताळतांना इतरांना जरूर पाहावे पण स्वतःला आधिक नीट पाहावे
श्रीधर तिळवे नाईक



Sunday, March 12, 2017

मोदीनंतर काय

कुणाला आवडो अगर न आवडो ११ व्या शतकानंतर बहुतांशी भारत  १८६० पर्यंत प्रोमुस्लिमवादी होता १८६० नंतर १९४७ पर्यंत प्रोख्रिस्चनवादी  होता १९४७ ते २०१३ तो सेक्युलरवादी होता आणि आता बहुतांशी हा देश हिंदुत्ववादी जवळ जवळ झालाच आहे  प्रश्न इतकाच आहे इतरत्र अनेक पाकिस्तानसारखे मुस्लिमबहुल देश जसे कट्टर मुस्लिमवादी झाले तसा तो कट्टर हिंदुत्ववादी होणार कि सौम्य हिंदुत्ववादी राहणार ? जर तो कट्टर हिंदुत्ववादी होऊ लागला तर आपण त्याला कसा आळा घालणार आहोत ?

ह्या देशात दोन प्रकारचे सांस्कृतिक विचारप्रणालीय  राष्ट्रवाद जन्माला आले १ हिंदुत्ववादी आणि दुसरा २ आंबेडकरवादी ह्या दोहोंच्या दरम्यान १९८५ नंतर शैव राष्ट्रवाद जन्मला ह्या शैव राष्ट्रवादाची मांडणी मी २००५ साली शैव पॅराडाईम आणि युरोपिअन पॅराडाइम ह्या अंगाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका चर्चासत्रात केली होती (ह्याचे एक विशाल पुस्तक झाले आहे ) ह्या देशातला मुख्य संघर्ष हा निगम विरुद्ध आगम असा आहे हे त्याचे मुख्य सूत्र आहे .  शैव , बौद्ध आणि जैन ह्या आगम मानणाऱ्या लोकांनी १  वैदिक  २ ब्राह्मण ३ वैष्णव  आणि  ४ वैष्णव हिंदू  ह्या जात वर्ण मानणाऱ्या निगमाविरुद्ध एकत्र यावे अशी ही मांडणी आहे पण प्रत्यक्षात झाले असे कि बौद्धांनी शैवांचा तिरस्कार आणि टवाळी करण्याखेरीज काहीच केले नाही आणि प्रामुख्याने ओ बी सी असणारे शैव हे हिंदुत्ववाद्यांना जाऊन मिळाले यूपीत ह्या शैवांनी प्रथम मायावतींना पाठिंबा दिला होता पण मायावतींनी ह्या पाठिंब्याची माती केली आता अवस्था अशी आहे कि ओबीसी शैव दलित नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत
नेमके ह्याचवेळी भाजपने नरेंद्र मोदी हे व्यापारी समुदायातून आलेले पण ओबीसी असलेले शैव नेतृत्व पुढे आणले आणि आमच्यासारख्या शैवाचार्यांची आणि ओव्हरऑल  शैव गुरवांची चांगलीच पंचाईत केली नकुलीशाचे शिष्य असणाऱ्या आणि गुजरातमध्ये एक प्रभावी पंथ असणाऱ्या शैव लकुलीश दर्शनाशी नरेंद्र मोदींचा गाढा संबंध आहे (ह्या कुळाच्या मंदिराचे उदघाटन त्यांच्याच हस्ते झाले होते ) तर शैव असणाऱ्या रामकृष्ण परमहंसाच्या रामकृष्ण मिशन आणि विवेकानंदावर त्यांची श्रद्धा आहे त्यामुळेच उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी सतत शैव मंदिरांना भेटी देत आणि त्याचा फार मोठा परिणाम शैव जनतेवर झालेला होता आणि आहे जोवर मोदी सत्तेवर आहेत तोवर भाजप कट्टर हिंदुत्ववादी बनणार नाही पण मोदींच्यानंतर काय ? कधीकाळी निगमांनी आद्य शंकराचार्य नावाचा शैव ब्राह्मण वापरून वर्णजातिव्यवस्था पुढे आणली होती नंतर पहिल्या बाजीरावापर्यंत शैव असणाऱ्या भट घराण्याला कट्टर वैदिक बनवून मनुवाद पुढे आणला होता मोदींच्यानंतर असे काहीच होणार नाही ह्याची खात्री काय ? नेमाडेंच्यासारखा वैयक्तिक पातळीवर पुरोगामी असणारा लेखकही शेवटी वैष्णव हिंदुवाद स्वीकारून जातीव्यवस्था अटळ आहे असे म्हणतो कारण निगमाचा विळखा ! हा विळखा भाजपला पडणार नाही ह्याची काय खात्री ? शेवटी गोळवलकरांच्या लिखाणात ह्या विळख्याचे समर्थन आहेच . त्या समर्थनाचा आणि विळख्याचा कमबॅक होणार नाही कश्यावरुन ? प्रश्न फक्त मोदींचा नाही तर मोदीनंतर काय होईल हाही आहे . ब्राह्मण आणि बनिया एकवेळ सौम्य राहतील पण शैव हे लडाकु आहेत त्यांचा देव आणि देवीची चंड आणि चंडिका होतात शैव मानसिक गुलामगिरीतून आता बाहेर येतायत आणि लढायला तयार आहेत तुम्ही दोन मारलात तर आम्ही चार मारू हे स्पिरिट त्यांच्यात आहे त्यांचे हे लडाकूपन जर मिसमॅनेज झाले तर ते कुणालाही परवडणारे नाही मी शैवाचार्य म्हणून त्यांना रोज पाहतोय ते भाजपला मत देतायत आणि मी भाजपचे समर्थन करावे अशी मागणीही करतात . ब्राह्मण , बनिया आणि ओबीसी अशी ही  युती आहे आंबेडकरांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यांना पूर्ण अमान्य आहे किंबहुना आंबेडकरवाद्याचा  आक्रमकपणा ( जो फेसबुकवरही प्रकट होतो ) हा त्यांना ३% टक्के मतदारांचा टिवटिवपणा वाटतो उरलेले  २२ %  दलित  - आदिवासी हे हिंदुत्ववादाला मिळतायत कारण ह्या  २२ % दलितांना  मुख्य हिंदू प्रवाहाशी समरस व्हायचे आहे असे त्यांना वाटते  लोकशाहीत आंबेडकरवादी दलितांची  फारशी किंमत आहे असे त्यांना वाटत नाही ५ % ब्राह्मण १७ % वैश्य  १० % समरसतावादी  दलित - आदिवासी आणि ४२ % ओबीसी ह्यांचे एकत्रित मतदान निवडणूक जिंकायला पुरेसे आहे ह्याची त्यांना खात्री पटलेली आहे आंबेडकरवादी दलितआदिवासी  आणि मुस्लिम मताविषयीची हे बेफिकीरी यूपीत
एकही मुस्लिम उमेदवार न देण्यात प्रकट झाली आणि तिला यशही मिळाले ह्या बेफिकीरीचे कट्टर हिंदुत्ववादात रूपांतर होणार नाही ह्याची खात्री काय ?

थोडक्यात सगळ्या विचारवंतांनी आता भाजप कट्टर होऊ नये म्हणून काय करता येईल ह्याचा साधकबाधक विचार करणे आवश्यक आहे



Avinash Gaikwad यांची कंमेंट ओबीसींना आंबेडकरवादी नेतृत्व नको असते तर मायावतीपासून सुशीलकुमार शिंदेंच्यापर्यंत अनेकांना नेतृत्व मिळालेच नसते आंबेडकरवादी नेतृत्व अपयशी झाले ही वस्तुस्थिती त्याची कठोर चिकित्सा करण्याऐवजी इतरांना जातीयवादी म्हणून सुटका करून घेणे ही तर फॅशन झाली आहे . ओबीसींनी ज्याचे नेतृत्व मानावे असा आंबेडकरवादी नेता सांगू शकशील काय ? आंबेडकरवादी कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहेत कि नाहीत  ? दलित नेतृत्वाची फाटाफूट ही माझ्यासाठी  अगम्य गोष्ट आहे

ओबीसी समूहात ब्राहमण क्षत्रिय वैश्य ह्यांच्याही काही जाती येतात आणि त्या बहुतांशी शैव आहेत शूद्रांच्यातील बहुतांश  जाती ह्या मूळच्या शैव आहेत तेव्हा तुला त्यांना मी शैव कॅटेगरीत टाकलंय ह्याचं तुला आश्चर्य वाटतंय ह्याचं मला आश्चर्य वाटतंय .
शैव आरेसला जाऊन मिळतात तेव्हा ते गुलाम बनतात ही जुनी गोष्ट झाली अविनाशराव ! भाजप हा बदललेल्या ब्राह्मणी मानसिकतेचा अविष्कार आहे नरेंद्र मोदी गुलाम आहेत असं म्हणायचय का तुला ?मला वाटतं कि हिंदुत्ववाद  हा कमालीचा गुंतागुंतीचा मामला बनलाय आणि तो आंबेडकरवादाच्या चौकटीत समजून घेणे आता शक्य नाही शत्रूशी लढायचे असेल तर शत्रू नीट समजून घ्यावा लागतो माझा प्रयत्न त्या दिशेने चालू आहे हा प्रयत्न इतरांना मानवावा अशी अपेक्षा नाहीये .

पोस्टचा संदर्भ यूपीची निवडणूक आहे त्यामुळे संदर्भ राजकीय आहे हे तर उघड आहे . माझ्या दृष्टीने भाजप हा
सर्व निगमांनी एकत्र येऊन तयार झालेला पर्याय आहे आणि खुद्द संघाला तो असे वळण घेईल असे अपेक्षित नसावे आपण अनेकदा आरेससला प्लानर म्हणून गृहीत धरतो .
एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाला एकच पर्याय होता आणि तो म्हणजे आंबेडकरवाद पण आंबेडकरवाद्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही त्यांनी स्वतःला दलितांच्यापुरतं आणि आदिवासींच्यापुरतं मर्यादित करून घेतलं आणि व्यवहार तर जातीयवादीच केला मी स्वतःला आयुष्यभर आंबेडकरवादी म्हणवून घेतले पण माझ्या जातीची सर्वाधीक चौकशी आंबेडकरवाद्यांनी केली आंबेडकरवाद्यांना ही गरज का भासते हा जातीय किडा का वळवळतो ?आणि हा फक्त माझाच नाही अनेकांचा अनुभव आहे माझ्या समोर अनेकांनी आंबेडकरवाद सोडला मी संन्यासी असल्याने मला अपेक्षाच नाही पण इतरांचे तसे न्हवते नाहीये माणसांना प्रतिसाद लागतो . आनंद यादव हे ह्याचे उत्तम उदाहरण रिपब्लिकन पार्टीचे गैरदलित अध्यक्ष किती हे मला सांगशील का ? हिंदुत्ववाद्यांचा सर्वसामावेशकपणा वाढत असतांना आंबेडकरवाद अधिकाधिक संकुचित होत गेला. ह्या देशात समाजवाद आणि साम्यवाद ह्यांना कधीच भविष्य न्हवते पण आंबेडकरवाद्यांना  मात्र होते पण खुद्द आंबेड्करवाद्यांनीच ह्या भविष्यावर माती टाकली ह्यापुढे ओबीसी आंबेड्करवादाकडे परतणे शक्य नाही खरेतर हे योग्य नव्हे कारण ओबीसी ही कॅटेगरी बाबासाहेबांनी दिलीये पण ओबीसींच्याच्याच हे गावी नाही हे दोन एकत्र यावेत म्हणून मी आगमवाद मांडला होता पण त्याला दोन्ही बाजूचा प्रतिसाद शून्य आहे एकीकडे मराठ्यांचा मराठावाद आणि वैदिक ब्राह्मण वैष्णव आणि वैष्णव हिंदू ह्यांचा मोदीप्रणित हिंदुत्ववाद ह्यांच्या कचाट्यात दलित चळवळ सापडली जाणे अटळ आहे .



*******************************************
गोवा यूपी मधील मुख्यामंत्रीपद , शैव धम्म  , भाजप आणि काँग्रेस

मी मागील पोस्टमध्ये निगमांनी मोदी सारख्या शैवाला पुढे टाकून आमच्यासारख्या आगमी लोकांच्या  केलेल्या  पंचाइतींबद्दल बोललो होतो शैव हा धम्म आदीशैव सांख्यशैव करत हिन्दुशैव पर्यंत पोहचला ह्या हिन्दुशैवची शंकराचार्यांनी कशी निर्मिती केली आणि पुढे ती शैव न राहता कशी वैष्णव बनवली गेली ह्याची सविस्तर चर्चाही मी ह्यापूर्वी दहा लेख लिहून केली होती

ज्यावेळेला शंकराचार्य हिन्दुशैव धर्म स्थापन करत होते त्याचकाळात मच्छिन्द्रनाथ आणि गोरखनाथ आदिनाथ म्हणजेच भगवान शिव ह्यांनी स्थापन केलेल्या योगकुळाला नवे जीवन देत होते आणि ह्यातूनच नाथशैव हा आणखी एक शैवपंथ निर्माण झाला . उत्तरेत मुसलमानांना सौम्य बनवण्यात ह्यांचा वाटा प्रचंड मराठीत हा पंथ स्थिर केला निवृत्तीनाथांनी पुढे त्यांचाच भाऊ ज्ञानेश्वर  वैष्णवांना जाऊन मिळाला आणि हरिहर एक करण्याचा सिलसिला सुरु झाला आणि त्याने हिन्दुशैवला हिंदूवैष्णव बनवणे सुरु केले ह्यातूनच मुस्लिमशैव व मुस्लिमवैश्णव नावाचा एक नवा फीनॉमिना जन्मला सुफी आणि शैव सुफी आणि वैष्णव ह्यांचे जबरदस्त कॉम्बिनेशन सुरु झाले आणि त्यातून कबीर आणि नानक असे महान संत जन्मले मराठीत हे कॉम्बिनेशन अवतरले ते एकनाथांचे गुरु जनार्दन ह्यांच्यात जनार्दनांचे काही शिष्य तर चक्क अरबी होते .

उत्तरेत गोरखनाथांच्या मठांनी ह्या मुस्लिमशैव मताला कायमच सांभाळून घेतले आणि महाराष्ट्रातही साईबाबांनी मुस्लिम शैववादाला मजबुतीच दिली ह्याला तडे जायाला लागले ते १९७५ नंतर !१९७५ नंतर ख्रिश्चन लोकांनी सगळा ईस्ट इंडिया ख्रिश्चन बनवण्याचे मिशन सुरु केले आणि कमालीचे यश मिळवले भारतातल्या पुरोगामी आणि सेक्युलर लोकांनी धर्मांतर हा व्यक्तिगत मुद्दा आहे असा सेक्युलर स्टॅन्ड घेतला दक्षिणेत गोवा ३० % ख्रिस्चन झालाच होता तो ४० % ख्रिश्चन झाला आणि किमान ५० % गोवा ख्रिश्चन बनवण्याचे प्लॅनींग सुरु आहे ह्याला विरोध करण्याऐवजी काँग्रेसने सेक्युलॅरिज्मच्या  नावाखाली गोव्याच्या ख्रिश्चनीकरणाला उत्तेजन द्यायला सुरवात केली जाणीवपूर्वक कोंकणी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण केला ह्यातच काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधींच्याकडे गेले ह्या काळात झोपलेल्या शैव आचार्यांनी आणि गुरवांनी काही कृतीच केली नाही आणि ह्याचा पुरेपूर फायदा घेत गोव्यातला ब्राह्मणांनी संघटित व्हायला सुरवात केली ह्यातून एकीकडे सनातन धर्म ही संघटना सशक्त  झाली तर दुसरीकडे भाजप सशक्तीकरण मोहीम सुरु झाली . सोनिया गांधी ह्या रोमन कॅथलिक धर्माच्या हस्तक आहेत असा अपप्रचार सुरु झाला . नेमकी ह्याचवेळी माझ्या मामाने म्हणजे माजी आमदार रोहिदास नाईक ह्यांनी आपला शिष्य सुदिन ढवळीकर ह्याला मगोपमध्ये पुढे आणायला सुरवात केली . ढवळीकरांनी मगोप उत्तम सांभाळला खरा पण काँग्रेस ही ख्रिश्च्नांची पार्टी बनत आहे हे त्यांच्या लक्ष्यात आले नाही मगोप हा कायमच बहुजनांचा पक्ष होता आणि बहुजनांच्यात ख्रिश्च्नांच्या आक्रमकतेबद्दल एक अस्वस्थता दाटलेली आहे हे लक्ष्यात घेण्याची जबाबदारी मगोपची होती पण मगोपने ही जबाबदारी पार पाडली नाही आणि ह्या अस्वस्थतेचा पुरेपूर फायदा घ्यायला भाजपने सुरवात केली भाजप हा पर्याय पुढे आल्याने ढवळीकरांचे मगोपचे पुनर्जीवन हे फक्त स्वप्न बनून राहिले मगोप आणि काँग्रेस द्विध्रुवीकरण जाऊन  भाजप आणि   काँग्रेस हे द्विध्रुवीकरण आले ब्राह्मणकेंद्री शैव ओबीसीवाद विरुद्ध ख्रिश्चनकेंद्री सेक्युलरवाद असे ह्या द्विध्रुवीकरणाचे स्वरूप आहे हे लक्ष्यात येताच ढवळीकरांनी उघडपणे सनातन संस्थेची पाठराखण करायला सुरवात केली आणि ह्याविरुद्ध बंड होऊन  खुद्द माझ्याच घरात फूट पडली आणि माझा पुतण्या सुरेल तिळवे हा आपचे तिकीट घेऊन ढवळीकरांच्याविरुद्ध उभा राहिला घरातच मते विभागली गेली कारण गेली साठ वर्षे सिंहावर शिक्का मारायची असलेली सवय सुटणार कशी ?आत्तापर्यंत मगोपच्या  सिंहाला एकगठठा मतदान करणारी तिळवे नाईक फॅमिली प्रथमच फुटली ढवळीकर सनातनी मते आणि बहुजनी मते घेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी झाले पण मगोपला दुसरी भाजप बनवण्याचे आणि मुख्यमंत्रीपद हासील करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र हवेत विरून गेले मग निवड करायची वेळ आली काँग्रेस सुधारली असे वाटत असतानाच सोनिया गांधींनी लुईझिनहोच नाव मुख्यमंत्रीपदी आणलं झालं हे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं होतं त्यामुळे हिंदू मुख्यमंत्री विरुद्ध ख्रिश्चन मुख्यमंत्री असे काही समीकरण समोर आले आणि सगळे हिंदू परीकरांच्या मागे गेले वास्तविक आपली ख्रिश्चनवादी इमेज सुधारण्याची काँग्रेसला ही चांगली संधी होती प्रतापसिंग राणेंचे वा इतर कुणा हिंदू आमदाराचे नाव पुढे आणले गेले असते तर काँग्रेसचे सरकार आले असते पण एकंदरच काँग्रेस नेतृत्वाला जमिनीवर पाय ठेवायची सवय राहिलेली नाही परिणामी गोव्यात पर्रीकर

यूपीत लढाई झाली ती मुस्लिमधार्जिणेपणा आणि हिंदूधार्जिणेपणा ह्यांच्यात ! विकासाचा मुद्दा दोन्हीकडे समान होता त्यामुळे तिथे सेक्युलर मते समान प्रमाणात गेली आणि धार्मिक मते एकगठठा भाजपला गेली आणि त्याचे श्रेय योगी आदित्यनाथ ह्यांचे होते गोरखनाथांच्या मठाचे हे प्रमुख ! हर हर महादेव म्हणत त्यांनी सगळे शैव युवक ह्या मठाच्या झेंड्याखाली एकत्र आणायला सुरवात केली एकेकाळी बौद्ध झालेल्या भारताला शंकराचार्यांनी हिन्दुशैव धर्माची स्थापना करून पुन्हा स्वतःच्या घरात आणले तसे आपण मुस्लिम ख्रिश्चन धर्मांतराला आळा घालत आहोत हा सुरवातीचा दावा पुढे घरवापसी आंदोलनापर्यंत पोहचला . एकेकाळी सगळा भारत बौद्धमय करीन अशी आकांक्षा बाबासाहेबांनी बाळगली होती आदित्यनाथ उलट्या दिशेने गेले आणि सगळा भारत हिंदुराष्ट्र करीन म्हणत ऍक्टिव्ह झाले शैवांच्यात मठप्रमुख कोणीही होऊ शकतो( हे माहित नसल्याने कर्नाटकात बसवेश्वर दलित होते अशी मांडणी पुढे येताच त्याला विरोध झाला वास्तविक शैवांच्यात कोणीही शैवाचार्य होऊ शकतो खुद्द बसवेश्वरांचे गुरु अस्पृश्य शैवाचार्य होते आणि बसवेश्वरांना त्यामुळे काहीही फरक पडला न्हवता ज्याने शैव आगम अवगत केलेत तो शैवाचार्य अशी साधी सरळ व्याख्या आहे गुरु अस्पृश्य शैवाचार्य आणि शिष्य ब्राह्मण शैवाचार्य हे वैदिकांनाच का बौध्दानांही डायजेस्ट होत नाही  ) त्यामुळे गढवाली राजपूत असूनही ते मठप्रमुख झाले त्यामुळे ब्राह्मण्याचा शिक्का त्यांच्यावर मानणे शक्यच नाही सगळा बहुजन ओबीसी वर्ग त्यांच्याकडे सरकला प्रश्न होता आदित्यनाथांना सांभाळून विकासाचा कार्यक्रम पुढे कसा न्यायचा ? त्यातून धर्मवादी मुख्यमंत्री आणि दोन विकासवादी उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुढे आणला गेला म्हणजे दोन्ही प्रकारचे व्होटिंग शाबूत ठेवून पुढची इलेक्शन जिंकण्याची ही नीती आहे परिणामी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री ! संघही खुश आणि मोदीही खुश ! परीकरांच्याबाबत तर दोघांचीही एकवाक्यता !

तर झाले ते असे आहे . प्रश्न आहे भाजपच्या ह्या रणनीतीचा सामना कसा करायचा ? ब्राम्हण क्षत्रिय वैश्य ओबीसीम्हणजे  ७० %  पैकी ६०% भाजपकडे २६ % पैकी १६ % दलित आदिवासी व१५ - २०% मुस्लिमांपैकी पैकी ७%  मुस्लिम अशी २३ % मायावतीकडे  ह्यातील ५० % मते विकासवादी तर ५०% धर्मवादी मते आहेत  आदित्यनाथ हे ह्या ५०% धर्मवादी मतांची केली गेलेली राजकीय कदर आहे ही कदर भारतीय राजकारणाला रसातळाला न्हेते कि राजकारणाला उंचावते हे येणारा काळच ठरवेल
श्रीधर तिळवे नाईक






















Saturday, March 4, 2017

सुत्तीय ,  खत्तीय आणि वर्णव्यवस्था श्रीधर तिळवे

प्राचीन भारतीय समाजात सुत्तीय आणि खत्तीय असे दोन समाज नेतृत्वासाठी भांडत होते ह्यातील सुत्तीय हे सुत्त रचायचे तर खत्तीय खेत नांगरायचे आणि व्यापार करायचे ह्यातील  सुत्तीय आपल्या मुलाच्या मागे सुत असा शब्द लावायचे   सुत्तीय लोकांचे काम इतिहास जपणे पूजास्थानांची निगराणी राखणे असे  . भारतीयांच्या अनेक प्राचीन रचना ह्या  सुत्तीयांनी जपल्या ही व्यवस्था खुली असल्याने कोणीही  खत्तीय वा सुत्तीय होऊ शके साधारण शासक हा ह्या दोन्ही समाजातून येऊ शके
      . प्राचीन शैव धम्मात तीन प्रकारचे सुत्तीय होते
 गणपती
 गुरु
 ब्राह्मण

पुढे गणपतींच्यात शासक  राजकीय गणपती आणि धार्मिक गणपती असे दोन प्रकार झाले त्यातील राजकीय गणपतींना गणाधिपती आणि धार्मिक गणपतींना शैवाचार्य वा ऋषी वा मुनी म्हंटले जाऊ लागले
गणाधिपती  राजे म्हणून काम करू लागले त्यांची निवड लोकशाही पद्धतीने होऊ लागली पुढे गुरुंच्यातही
  गुरुव     आचार्य असे दोन प्रकार झाले ह्यातील गुरुव हे पुजारी झाले तर आचार्य शैव दर्शनाचे
 चिकित्सक ! गुरूवांना धर्मगीते  कम्पोज करण्याचा आणि गाण्याचा अधिकार होता तर ब्राह्मणांना गुरुवांना साहाय्य करण्याचा आणि धर्मगीते लिहिण्याचा .\
पुढे खत्तीयातील शासक समूहाने शासकांच्या सत्तेबाबत अनुवंशवादी दृष्टिकोन स्वीकारायला सुरवात केली आणि शासकाचा मुलगा शासक हे धोरण अवलंबायला सुरवात केली ज्याला  सुत्तीयांचा ठाम विरोध होता शहाला काटशह म्हणून   सुत्तीयांनी आपलाही अधिकार आनुवंशिक आहे म्हणायला सुरवात केली जो   खत्तीयांना अमान्य होता  सुत्तीय आणि खत्तीय  दोघेही एकमेकांचा आनुवंशिक हक्क मानायला तयार न्हवते  मात्र स्वतःचा हक्क सोडायला तयार न्हवते  सुत्तीय आणि खत्तीय  आनुवंशिक हक्काबाबत सारखेच आग्रही होते  ह्या वादात ब्राह्मणांना आपले स्थान काय हा प्रश्न पडू लागला खत्तीयानी त्यांना उत्तेजन द्यायला सुरवात केली त्यामुळे आपण प्रत्यक्ष सुत्ते  रचणारे असूनही केवळ सुत्ताचे सादरीकरण करण्याऱ्या गुरुवांना मुख्य स्थान का असा प्रश्न त्यांना पडायला लागला ब्राह्मणांना आपले हे दुय्यम स्थान सहन करणे अवघड झाले विशेषतः अफगाणिस्तानमधून भारतात शिरलेल्या टोळ्यांच्या पुजाऱ्यांना ब्राह्मण म्हणून ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले असले तरी ते त्यांच्या स्थानाविषयी फारसे खुश न्हवते हीच गोष्ट शैव ब्राह्मणांच्या बाबत होती ते समाधानी न्हवते पण व्यवस्था लवचिक असल्याने त्यांना गुरुव बनणे शक्य होते त्यामुळेच अनेक ग्रीक , सेमिटिक आणि शक हुन पुरोहित ह्या व्यवस्थेत सामावून घेतले गेले

ह्या व्यवस्थेला छेद मिळाला तो लिखित क्रांतीने ! ह्या हस्तलिखित क्रांतीने ब्राह्मणांच्या रचनांना संघटित करायला सुरवात केली आणि त्यातून वेदांची निर्मिती होऊ लागली  . गुरूवांनी ह्या नवीन तंत्रज्ञानाकडे साफ दुर्लक्ष्य केले आणि त्यातून मौखिकतेत अडकलेला मूळ शैव धम्म मागे पडायला लागला आणि हस्तलिखितप्रधान  ब्राह्मणांचा नवा धर्म उदयाला येऊन प्रबळ होऊ लागला त्यातून दोन धर्म तयार झाले खत्तीयाचा असुरधर्म आणि सुत्तीयांचा  सुरधर्म
खत्तीय असुर प्रबळ असल्याने त्यांनी भारतावर किमान सहाशे वर्षे राज्य केले त्याउलट सुरधर्म मात्र मागे पडला असुरधर्माने स्वतःचा झोरोस्ट्रियन धर्म तयार केला तर सुरांनी स्वतःचा वैदिक धर्म ! हे दोन्हीही अग्निप्रधान धर्म होते कारण दोघेही हिमालयाच्या पायथ्याशी बर्फात जन्मले होते हे दोन्हीही हिमालयीन भारतीयांनी जन्माला घातलेले धर्म होते असुर धर्म तर थेट इराणपर्यंत पसरला आणि असुरांनी भारतीयांच्यावर वारंवार राज्य केले . ह्यातील काही असुरांनी असुरधर्म आणि शैव धम्म ह्यांची सांगड घालायला सुरवात केली आणि त्यातून असुर कपिलाने नव्या शैव धम्माची स्थापना केली हा शैवधम्म म्हणजे सांख्यशैव    धम्म होय ह्यातूनच उपनिषदे जन्मली
हा कपिलच गौतम बुद्धाचा  गुरु  होता . कपिल आणि बुद्ध दोघेही असुर होते आणि ह्याही काळात   सुत्तीय आणि खत्तीय असा वाद सुरूच होता आणि बुद्धाच्या आयुष्यातही  त्याचे पडसाद उठलेले होते सुत्त रचण्याचा अधिकार  खत्तीयांना आहे असा युक्तिवाद करणारा गौतम बुद्ध स्वतःच्या घराण्याचा शासक म्हणून असलेला आनुवंशिक हक्क सोडायला तयार न्हवता मी  खत्तीय आहे असे अभिमानाने सांगणारा गौतम बुद्ध एकाही राजाला तू राज्यपदावरचा तुझा आनुवंशिक हक्क सोड असा उपदेश देतांना दिसत नाही  गौतम बुद्धांनी सुरधर्माला नकार देण्याऱ्या नवीन असुर धम्माची स्थापना केली तो असुर धम्म म्हणजे आत्ताचा हीनयान बौद्धधम्म होय पुढे राजा अशोकाने सर्वच शैवांना बुद्धधम्म स्वीकारायला सांगितले तेव्हा शैवांच्यापुढे वेगळाच पेच निर्माण झाला तो म्हणजे हा मूळ हीनयान आणि आपला शैवधम्म ह्यांची सांगड कशी घालायची त्यातून सकृतदर्शनी लिंगाऐवजी बुद्धाची मूर्ती स्वीकारायची पण बाकी सगळी जीवनपद्धती शैवांची ठेवायची अशी सांधेजोड जन्माला आली . त्यातूनच शैवांचा भक्तोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून महायान बौद्ध  तर शैवांचा तंत्रोपाय आणि हीनयान ह्यांच्या समन्वयातून वज्रयान ह्यांचा जन्म झाला . जगभर जो बौद्ध धर्म पसरला आहे तो हा महायान आणि वज्रयान शैव बौद्धधम्म आहे मूळचा गौतम बुद्धांचा निखळ ज्ञानकेंद्रित ज्ञानोपायी हीनयान धम्म आज जवळ जवळ कुठेच नाही ह्या घडामोडीत मूळचा आदीशैव आणि तो जपणारा गुरुव आणि शैवाचार्यांचा समाज समाजाबाहेर फेकला गेला मौर्यकाळानंतर शृंग  काळात ब्राह्मणांनी सांख्यशैव आदीशैव आणि ब्रह्मशैव आपल्या ताब्यात घ्यायला सुरवात केली खत्तीय आणि सुत्तिय ब्राह्मण ह्यांच्यात तडजोड होऊ लागली  


शेवटी दोघांनीही एकमेकांचा आनुवंशिक हक्क मान्य केला आणि भारतात वर्णव्यवस्थेचा प्रारंभ झाला भारतीय वर्णव्यवस्था ही ह्या दोघांचे साटेलोटे आहे 


तीन टिपणे

मी कम्युनिस्टविरोधी आहे पण प्रामाणिक कॉम्रेड्सविषयी मला प्रचंड प्रेम आहे मात्र कम्युनिस्टांच्या हिंसेविषयी मात्र मला कसलीच आस्था नाही जगभर कम्युनिस्टांनी जे हिंसावादी थैमान घातले आहे त्याचा तीव्र निषेध आपण केलाच पाहिजे हिंसा कुठल्याच प्रश्नाचे समाधान न्हाही त्यामुळे केरळातल्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो


कुंदन चंद्रावत ह्यांनी लावलेले बक्षीस हे ह्या देशातील वैदिकांचे कसे तालिबानीकरण होत आहे त्याचा नमुना आहे . त्यांचाही मी तीव्र निषेध करतो . बाळासाहेब ठाकरे ह्यांनी आपकी अदालत मध्ये ३००० वर्ष हिंदूंनी मार खाल्ला आत्ता बस आता मी हिंदू मिलिटनटीझम चा स्पष्ट पुरस्कार करतो असे म्हंटले होते हिंदूंची सर्वसहनशील इमेज हा एकेकाळी अभिमानाचा विषय होता तसा तो ह्यापुढे राहणार नाही हे आता स्पष्ट होते आहे तुम्ही दोन माराल तर आम्ही आता चार मारू अश्या मानसिक स्थितीत जर हिंदू आला असेल तर त्याला त्या अवस्थेपाशी कुणी पोहचवले ह्याची परखड समीक्षा करण्याची वेळ आता आली आहे आपल्याकडचे पुरोगामी ज्या सहनशील , सर्वधर्मसहिष्णू हिंदूंची इमेज उराशी बाळगून आहेत ती आता फक्त इमेजच उरली आहे काय हे तपासण्याची गरज आता निश्चितपणे निर्माण झाली आहे

समाज आत्ता जसा आहे तसाच पहावा लागतो  भूतकाळात तो काय होता ह्या प्रश्नाला काहीही अर्थ नाही . मोदींना मिळणारी मते ही बदलत्या हिंदू मानसिकतेला मिळालेली मते आहेत ही बदललेली मानसिकता बहुसंख्याक मानसिकता होणार असेल तर तिच्याशी लढतांना जुनी विचारप्रणाली कामाला येणार नाही खुद्द दलितांच्यात महारेतर दलित सरळ सरळ भाजपला जाऊन मिळतो आहे आणि रामदास आठवले सारखे आंबेडकरवादी हे काळाची पावले ओळखून भाजपला व शिवसेनेला जाऊन मिळत आहेत ह्याला अपवाद केरळ हे राज्य होते पण अलीकडे   केरळमध्येही संघाचा आणि  भाजपचा प्रभाव वाढताना दिसतोय  आणि कम्युनिस्टांना संघाच्या ह्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटणे साहजिक आहे केरळ हे एकेकाळी वैदिक राज्य होते आणि तिथे ब्राह्मण आणि शूद्र असे  दोनच वर्ण होते त्यामुळेच ह्या कट्टर वर्णव्यवस्थेच्या समर्थक व्यवस्थेवर कम्युनिझम हाच उत्कृष्ट इलाज होता हा इलाज गेला तर पूर्वीचा कट्टर ब्राह्मण्यवाद उफाळून येणार नाही ह्याची खात्री काय ? त्यामुळे तिथे ह्या दोन विचारप्रणालीतील  संघर्ष हा निकराचा होणे अटळ आहे मात्र तो काहीकेल्या हिंसक बनता कामा नये   भाजपवादाला कम्युनिझम हा पर्याय नाही पण   केरळपुरता हा पर्याय  उगवलेला होता आणि आहे आणि तो हिंसक बनणे हे परिवर्तनवादी चळवळीला परवडणारे नाही .

कृष्णा किरवले हत्यासंदर्भात नक्की सत्य काय हे पुढे येईलच पण त्यांचे असे दुर्देवीपणे जाणे जिव्हारी लागते आहे . हे वैयक्तिक आर्थिक बाचाबाचीतून झाले असे क्षणभर गृहीत धरले तरी  ज्याने त्यांना मारले त्याला ते विचारवंत आहेत ह्या गोष्टीची कदर का वाटली नाही कि प्राध्यापक विचारवन्त लोकांची सामाजिक इज्जत संपली आहे ?

श्रीधर तिळवे नाईक